Sunday, November 11, 2018

दिवाळी , फराळ‌ आणि त्याचं दडपण



(Inspired by an earlier post by Mrinmayee Ranade-also shared on my wall earlier)

चला आता दिवाळी संपली. दिवाळीत बायकांना फराळ करण्याचं‌ दडपण असत असं वाचण्यात आलं. तर हे  दडपण का असावं? फेसबुक , social media वर बायका फराळाचे फोटॊ share करताना दिसतात. त्यामुळे हे दडपण येत असावं  का ? घरातून घरचाच फराळ हवा अशी मागणी होत असेल का ?
त्यामुळे हे दडपण येत असावं  का ?
बघूया...

आपण आपल्या आईला घरी सांग्रसंगीत फराळ करताना बघितलेलं असतं . कधीकधी अगदी नोकरी मुलं बाळं संभाळून हे सगळं तिने केलेलं असतं . मग त्यामुळे आपल्या मनांत आपल्याला आईसारखं करता आलं पाहिजे अशी‌ इच्छा असते. ती कितपत चूक कि बरोबर याचा विचार करायला हवा. मागे मृण्मयी रानडे म्हणाल्याप्रमाणे , काळानुसार भरपूर बदल झाले आहेत . त्यामुळे दोन पिढ्यात होणार्या गोष्टींची तंतोतंत तुलना नाही होऊ शकत.

दुसरं दडपण फेसबुकवरील फोटोंमुळे येऊ शकतं . अमुक एक कोणातरी कसं सगळ करतेय आणि आपण कसं काहीच नाही करत असं वाटू शकतं. तर फेसबुक वरील दाखवायचे दात आणि घरात खायचे दात वेगळे असतात हे न कळण्याइतके आपण दुधखुळे नक्कीच नाही आहोत . तो फराळ पोस्ट टाकणाऱ्या बाईने केलेला असतो की मदतनीसांकडून करवून घेतलेला असतो हे कसं सांगणार ? आणि अगदी स्वतः केला असेल तर बाकीचे जेवण केले का नुसता फराळ बनवायचा म्हणून जेवण बाहेरुन मागवले?

आणि अगदी सगळा फराळ स्वतः केला असेल तर स्वतःच्या घरच्यांसाठी केला . कोणावर त्याचे उपकार नाहीत. ते करतात म्हणून त्याचं दडपण आपल्यावर  नकॊ. प्रत्येकाची परिस्तिथी वेगळी. आणि  त्यामुळे आपल्या सोयीनुसार प्रत्येकजण करतं.
कित्येक बायका लोकांना दिसायला पाहिजे म्हणून मुद्दामून दिवाळीच्या  वेळी फराळ करतात . नाहीतर वर्षाचे बाकीचे महिने साधा स्वयंपाक करतील का याचा प्रश्न पडतो .हे  मी  माझ्या स्वतः  बघितलेल्या अनुभवावरून सांगते.

जेवण केलं असो व नसो , पण ते वाढण्यात पुढे पुढे करणाऱ्यांची संख्या कमी नाही. आता त्या गोष्टींचं किचनमध्ये मधे रांधणाऱ्या बायकांनी दडपण घ्यावं का?

सांगण्याचा मुद्दा हाच की , फराळ घरी केला म्हणजे आपण सुग्रणपणाची परीक्षा पास झालो असं काही नाही . आपल्या घरच्यांसाठी आपण रोज पौष्टिक अणि घरच अन्न करणं महत्वाचं . मग ते स्वतः करा नाहीतर मदतनीसांकडून करुन घ्या.

आपल्या आईकडून प्रेरणा घेऊन, फेसबुक फराळ फोटोस वरुन प्रेरणा घेऊन फराळ केला तर उत्तमच. पण तो नाही करता आला तर त्याचं दडपण नकॊ. कारण आपली सोय महत्वाची.
आणि हे नुसतं दिवाळी फराळाच्या बाबतीत लागू नाही.  अनेक रीती-भाती निभावताना आपली सोय महत्त्वाची.

-धनश्री जोगळेकर
https://dsaidso.blogspot.com

No comments:

Post a Comment

Varan bhat

  In the first month of our marriage, my husband visited my mom's for dinner. I wasn't joining, so my mom asked what to make. I come...